पालघरः वीज बिल आणि सरकारी योजनेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने धाकट्या भावाची हत्या केली. पालघर जिल्ह्यातील साकळे पाडा गावात ही घटना गुरुवार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
चंद्रकांत जीतू पाटील असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर,सतीश जितू पाटील असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी घरकुल योजनेचा लाभ आणि घरातील वीज बिलावरून चंद्रकांत आणि सतीश यांच्यात नेहमीच वाद होत असे. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात सतीने चंद्रकांतवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रकांत जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि सतीशला अटक केली.